माहितीचा अधिकार एक अमूल्य अधिकार आहे. सर्व विकसनशील देशात लोकांना माहितीचा अधिकार मिळालेला असून भारतातही या अधिकाराची व्यवस्था काही वर्षांपूर्वी करण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य माणसाला सरकारी कामकाजाच्या खोलात शिरून सरकारला प्रश्न विचारता येतात. माहिती मिळाल्यामुळे लोकांना सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती कळते. त्यामुळे सरकारी यंत्रणेच्या गैरवापरावर बंधने घालता येतात.२००५ मध्ये सरकारच्या वतीने 'माहितीचा अधिकार कायदा' पारित करण्यात आला. माहितीचा अधिकार कायद्यामुळे सामान्य लोकांना सार्वजनिक संस्था आणि इतर सरकारी कार्यालयामधून माहिती मिळविण्यासाठी सक्षम बनवितो. माहितीचा अधिकार अधिनियम म्हणजे पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा याचे नवीन युग आणणारे सशक्त यंत्र आहे. या कायद्याची माहिती सामान्य लोकांना व्हावी म्हणजे ते जनहितासाठी त्याचा बिनधास्तपणे वापर करू शकतील, याच एकमेव उद्देशाने सदर पुस्तक लिहिले आहे.